सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२१.०६.२०२०
महाबळेश्वर- महाराष्ट्राचे नंदनवन, निसर्गाला पडलेले सुंदर स्वप्न, महाराष्ट्राची अस्मिता, अभिमान, आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ अशी अनेक बिरुदावली असलेले थंड हवेचे शहर महाबळेश्वर सध्या नगरपालिकेच्या भ्रष्ट आणि भोंगळ कारभाराने चांगलेच गरम झाले आहे.
उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार महाबळेश्वर नगरपालिकेने शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एसटीपी प्लांटची निर्मिती केली खरी पण शहरातील दुषित सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारलेला एसटीपी म्हणजेच Sewage Treatment Plant हा केवळ उच्च न्यायालय,सरकारी यंत्रणा, हरित लवाद,शहरातील नागरिक यांची दिशाभुल करण्यासाठीच उभा केला आहे का असा प्रश्न एसटीपी प्लांट नं.१ ला भेट देण्यास गेलेल्या निर्भीड पत्रकारच्या टीमला पडला. कारण या एसटीपी प्लांटची निर्मिती ही बंधनकारक असल्यामुळे नगरपालिकेने केली असली तरी या प्लांट मध्ये कसल्याही प्रकारची पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया दूषित पाण्यावर होत नसुन हे पाणी “आहे त्याच स्थितीत” म्हणजे दूषित स्थितीतच नैसर्गिक स्रोतांमध्ये सोडण्याचे काम नगरपालिकेकडून बिनधास्तपणे होत आहे. सदर दूषित पाणी हे शुद्ध आहे असा विश्वास नागरिक ठेऊन पुढे या पाण्याचा शेतीसाठी, पिण्यासाठी, व अन्य कारणांसाठी उपयोग करत आहेत. तर जंगलांनी वेढलेल्या महाबळेश्वरमध्ये असलेले वन्यप्राणी देखील हे दुषित, घातक पाणी आपली तहान भागविण्यासाठी पित असल्याने मानव प्रजाती प्रमाणेच येथील वनसंपदा देखील धोक्यात आली आहे.
कोरोनाच्या संकटाने समस्त जगाला हादरवून सोडले असून हे संकट महाबळेश्वरच्या सीमेपर्यंत येऊन ठेपले आहे. या परिस्थितीमुळे भारतीयांना आरोग्याचे महत्व समजले असून एक कदम स्वच्छता की ओर असे म्हणत “स्वच्छ भारत अभियानाचा” डांगोरा पिटणारी महाबळेश्वर नगरपालिका महाबळेश्वर वासीयांच्या आरोग्यासाठी फारशी गंभीर नसून उदासीन असल्याचे चित्र आहे. महाबळेश्वर येथील सांडपाणी,दूषित पाणी हे प्रक्रिया न करता नैसर्गिक स्रोतांमध्ये सोडता येणार नसल्याने उच्च न्यालायच्या आदेशाने महाबळेश्वर पालिकेने एसटीपी प्लांटची निर्मिती केली खरी पण या प्लांटला भेट दिल्यानंतर निर्भीड पत्रकारच्या टीमला अनेक धक्कादायक खुलासे नजरेस आले असून शहरातील जमा करून प्रक्रिया करण्याच्या हेतूने एकत्रित आणलेले हे दूषित पाणी प्रक्रिया न करताच आहे त्याच परिस्थितीत म्हणजे दूषित स्वरूपातच नैसर्गिक स्रोतांमध्ये सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार या मुळे उजेडात आला आहे.गेल्या दोन वर्षांपासून एसटीपी प्लांट नं.१ हा अंशतः चालु अशा अवस्थेत (जवळ जवळ ७५% बंद) असुन नगरपालिकेकडून ज्या “Aqua Engineers” या पुण्याच्या ठेकेदार कंपनीला हा एसटीपी प्लांट चालविण्याचा ठेका मिळाला आहे त्यास न चूकता नगरपालिका बिल अदा करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.वास्तवात एसटीपी गेल्या दोन वर्षांपासून अंशतः चालु व बाकी बंद अवस्थेत असून कसलेही शुद्धीकरणास आवश्यक टेस्ट रिपोर्ट, लॅब,रसायने असे कसलेही साधन या प्लांट वर उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे.या एसटीपीला नगरपालिकेने कधी भेट दिली आहे का ? मुख्याधिकारी व संबंधित अधिकारी डोळे बंद करून या एसटीपीच्या ठेकेदाराला बिल अदा करतात का ? की या अधिकाऱ्यांचे आर्थिक लागेबांधे या ठेकेदाराशी असल्यानेच ही डोळेझाक जाणीवपूर्वक केली जाते का ? मुख्याधिकारी शहराच्या व वन्य प्राण्यांच्या आरोग्याच्या प्रश्नाबाबत गंभिर नाहीत का ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झाले असून.डोळे झाकण्यासाठी अनेक संबंधित बोक्यांना लाचरूपी तूप दिले जात असून याच तुपामुळे अनेक सुकलेले बोके जाडजूड झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.
हा एसटीपी प्लांट नगरपालिका सोसायटीच्या पाठीमागे ‘तथागत नगर’ येथे आहे.या वस्तीमध्ये १००% नागरिक हे अनुसुचित जातीतील आहेत.संपुर्ण शहरात या प्लांटला विरोध होत असताना नगरपालिकेने हा प्लांट तथागत नगर येथे बनविला.हा एसटीपी प्लँट आजवर कधीच पुर्ण क्षमतेने व कार्यक्षमतेने चालविला गेला नाही.त्यामुळे या प्लांट मधून नेहमीच दुर्गंधी येत राहते. सदर प्लांट हा नागरी वस्तीत मध्यभागी असल्याने तो कार्यरत नसल्याने वेळोवेळी येथील नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.या प्लांट मधुन सोडले जाणारे पाणी हे ओढ्याच्या मार्गे चायनामन वॉटर फॉल या प्रसिद्ध धबधब्यामध्ये सोडले जाते.हा धबधबा अतिशय नयनरम्य असून पर्यटकांचे खास आकर्षण आहे.या धबधब्यामध्ये एसटीपी प्लांट मधून प्रदूषित पाणी सोडले जाते या पाण्यामध्ये अक्षरशः अळ्या सदृश्य कीटक उत्पन्न झालेले असतात.हा ओढा वाहतो त्या परिसरात नागरिक स्ट्रॉबेरीची शेती करतात तर मूनवर हौसिंग सोसायटी व जिजामाता सोसायटी या नागरी वस्त्या मधुन हा ओढा पुढे जातो.त्यामुळे येथिल नागरिकांना देखील अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.चार वर्षांपूर्वी याच ओढ्याचे पाणी पिल्याने अनेक नागरिकांना ‘गॅस ट्रो’ या घातक आजाराला सामोरे जावे लागले होते.सदर ओढ्यात नगरपालिकेने सोडलेले पाणी हे रंगाने पुर्णपणे काळे असुन दिसता क्षणी त्यातील अशुद्धी उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास स्पष्ट दिसून येते.या एसटीपी प्लांटच्या मार्फत प्लान्ट मधून बाहेर पडणाऱ्या पाण्यावर सर्वच्या सर्व प्रक्रिया पुर्ण होऊन हे पाणी बाहेर सोडणे बंधनकारक आहे मात्र असे होतच नाही अशी तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत.तर येथे कोणी वॉचमन देखील न नेमल्याने विद्यूत पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला चिकटून दोन बकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.सुदैव इतकेच की अजून माणसाचा जीव येथे गेला नसला तरी येत्या काळात नगरपालिका व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे भविष्यात माणसाचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एसटीपी क्र.१ मधुन सोडण्यात आलेले पाणी पुढे ओढामार्गे कोयना नदीच्या प्रवाहात मिसळले जाते. कोयना नदीपात्रात मिसळण्यापुर्वी हे पाणी अनेक गावातून घनदाट जंगलमार्गे पुढे प्रवास करते त्यामुळे येथील संपुर्ण वनसंपदेस या दुषित पाण्यामुळे हानी पोहोचत असुन धोका निर्माण झाला आहे.
या प्रकरणी हरित लवाद,वनखाते,जिल्हाधिकारी, राज्यसरकार लक्ष घालून कारवाई करणार का ? असा प्रश्न देखील नागरिक विचारत असून कोरोनाच्या संकटाचा आधार घेऊन भ्रष्टाचार करणाऱ्याना शासन करण्यासाठी या प्रकरणी राज्य शासनाने तातडीने उच्च स्तरीय चौकशी समिती नेमून संबंधीतांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
काही दिवसांपूर्वी निर्भीड पत्रकारच्या टीमने एसटीपी नं.२ ला भेट देऊन तेथील गलथान कारभार व बोकाळलेला भ्रष्टाचार उघड केला होता.एसटीपी क्र.१ चा तसाच धक्कादायक कारभार पाहून आता नगरपालिका या एसटीपी च्या ठेकेदारांना दूषित पाणी प्रक्रिया न करता नैसर्गिक स्रोतांमध्ये सोडण्यासाठीच पैसे देते की काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.तर असा अकार्यक्षम एसटीपी प्लांट आम्ही नागरी वस्तीत चालु देणार नाही.नगरपालिकेने तात्काळ ठेकेदारावर कारवाई न केल्यास हा एसटीपी आम्ही उध्वस्त करू असा इशारा बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप,महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक किरण शिंदे यांनी दिला आहे.इथुन पुढे “Save Mahableshwar” ही मोहीम संघटनेच्या वतीने चालवली जाणार असून या मार्फत महाबळेश्वरचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे किरण शिंदे यांनी म्हटले आहे.