सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०१.०८.२०२०
महाबळेश्वर नगरपालिका हद्दीतील रांजणवाडी या परिसरामध्ये दि.३०.०७.२०२० रोजी कोविडचे काही पेशंट रात्री दवाखान्यात नेण्यावरून प्रशासन व नागरिक यांच्यामध्ये बाचाबाची झाली त्यामुळे काहीसा तणाव निर्माण झाला.यावेळी काही वाहनांचे नुकसान झाले.याप्रकरणी महाबळेश्वर पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वि.३५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, दि.३०.०७.२०२० रोजी रांजणवाडी येथे नगरपालिकेच्या वतीने ४७ जणांच्या रॅपिड कोविड टेस्ट करण्यात आल्या. त्याचा अहवाल काहीच मिनिटांत मिळाला व त्यामध्ये एकूण ७ व्यक्ती पॉजिटीव्ही आढळल्या. त्यामुळे नगरपालिका अधिकारी व कर्मचारी आपल्या स्टाफसह रांजणवाडी येथील वस्तीमध्ये या पेशंटला दवाखान्यात नेण्यासाठी त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना कॉरन्टाइन करण्यासाठी गेले असता परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात जमा झाले व त्यातून तणावाचे वातावरण निर्माण झाले.या प्रकरणी नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याने चार जणांविरुद्ध व १०० ते १२५ अज्ञातांचे विरुद्ध फिर्याद दिली आहे. घटनास्थळी जाऊन अधिक माहिती घेतली असता या घटनेस पाच सहा दिवसांची पार्श्वभूमी असल्याचे समोर येत आहे.जेव्हा या परिसरात कोरोनाचा पहिला पेशंट आढळला त्या वेळी याच गावातील काही नगरपालिका कर्मचारी यांना गेटवर तैनात करण्यात आले होते. त्यातील दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्या कर्मचाऱ्यांना रात्री दवाखान्यात नेतेवेळी एक नगरसेवक व एक नगरसेविकेचा पती यांचेकडून संबंधित कोरोना पेशंटला गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे येथील नागरिक दुखावला गेला होता.त्यानंतर त्याच नगरसेविकेच्या पतीने रांजणवाडी कंटेंनमेंट झोन म्हणून प्रांताधिकाऱ्यांनी घोषित करण्यापूर्वीच एक दिवस आधीच “रांजणवाडी कंटेनमेंट झोन” या नावाने व्हाट्स अप ग्रुप चालू केला. त्याला गावकऱ्यांनी फोन करून तुम्हाला कंटेनमेंट झोन घोषित करण्याचा अधिकार आहे का ? असा जाब विचारला त्यावर त्या नगरसेविकेच्या पतीने उलट उत्तरे दिली. त्याबाबत आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याचे काही नागरिकांनी सांगितले आहे.दरम्यान दि.३०.०८.२०२० रोजी सात पेशंट पॉजिटीव्ह आढळल्या नंतर त्यांना रात्री साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास दवाखान्यात व कॉरन्टाइन सेंटर मध्ये नेण्यासाठी गेले असता पेशंट व नातलग यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. सदर ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. पण कोणीही दगडफेक केली नाही.असे नागरिकांचे म्हणने असून नगरपालिकेकडून नगरसेविकेच्या पतीला जाब विचारला म्हणून त्याचा राग धरून आमच्या गावाला लक्ष करण्यात आले असून खोटे गुन्हे दाखल केले असून ते तात्काळ मागे घेण्यात यावेत अशी मागणी नागरिक करत आहेत.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अब्दुल बिरदी करत आहेत.
या सर्व घटना क्रमाचा आढावा घेता रात्रीचे कोविड पेशंट घरातून घेऊन दवाखान्यात नेण्याची खरंच आवश्यकता होती का ? हे काम करताना दिवसाचे देखील करता आले नसते का ? इतक्या मोठ्या प्रमाणात पेशंटला दवाखान्यात स्थलांतरीत करते वेळी पोलीस संरक्षण सोबत का नेले नाही ? खरंच पालिकेचे कर्मचारी व नगरसेवक कोविड पेशंटना तुच्छतेची वागणूक देत आहेत का ? नगर सेविकेच्या पतीला कंटेनमेंट झोन घोषित करण्याचा अधिकार आहे का ?लोकप्रतिनिधींच्या पतीच्या चमकोगिरीसाठी केलेल्या लुडबुडीला आळा बसणार का ? प्रशासन अशी कारवाई करत असताना दुसऱ्या वॉर्डचा नगर सेवक व नगर सेविकेच्या पतीची उपस्थिती गरजेची आहे का ? बकरी ईद च्या तोंडावर धार्मिक दंगे घडवून आणण्याचा हा कट तर नव्हता ना ? या प्रकरणामागे नक्की मास्टरमाइंड कोण ? सदर वस्ती ही मुस्लिम बहुल असल्याने त्यांच्याशी दुजेपणा केला जातो आहे का ? संबंधित नगर सेविकेच्या पतीने रांजणवाडी हा प्रांताधिकारी यांचेकडून कंटेनमेंट झोन घोषित करण्यापूर्वीच “रांजणवाडी कंटेनमेंट झोन” नावाचा व्हाट्स अप ग्रुप चालू केल्या प्रकरणी त्याचेवर कोविड काळात अफवा पसरविल्या प्रकरणी कारवाई होणार का ?
असे अनेक प्रश्न या निमित्ताने नागरिकांना पडले आहेत.झालेली घटना निश्चितच दुर्दैवी आहे.पण ही घटना घडण्यामागे नक्की काय कारणे होती याचा विचार प्रशासन करणार की नाही ? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे.