नागपूर(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१६.०७.२०२१
नागपूर- महापालिका निवडणूक सात महिन्यांवर आली असताना विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांना निवडणुकीचे वेध लागले आहेत. करोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून मतदारांशी संपर्क कमी झाल्याने आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आता वेगवेगळे शिबीर आणि उपक्रमांच्या माध्यमातून संपर्क सुरू झाला आहे. परंतु, विद्यमान नगरसेवकांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून महापालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. प्रभाग पद्धतीमुळे भा.ज.पा.ला २०१७ च्या निवडणुकीत भरघोष यश मिळाले. १०८ सदस्य निवडून आले. राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार आहे आणि निवडणुकीसाठी आघाडीतील तीनही पक्षांनी आपापल्या पद्धतीने शहरात संघटनात्मक काम वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सत्ताधारी भा.ज.पा.चे विद्यमान व इच्छुक सदस्य कामाला लागले आहेत. गेल्या दीड वर्षांत करोनामुळे संपर्क न ठेवणारे विद्यमान नगरसेवक दररोज सकाळी आपापल्या प्रभागात फिरत आहेत. काही नगरसेवकांनी लसीकरण आणि विविध प्रमाणपत्र शिबीर आयोजित केले आहेत. तीन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विद्यमान सदस्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल या मानसिकतेमध्ये राहू नका, असा दम दिला होता. त्यामुळे आता उरलेल्या दिवसात प्रभागात काम करून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी नगरसेवकांची धडपड सुरू आहे. कुठली कामे केल्यास प्रभागातील मतदार खुश होतील, हे ओळखून कामे करण्यावर भर दिला जात आहे. शिवाय, निवडणुकीत ज्या कामांसाठी आश्वासने देण्यात आली होती, ती कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.