बीड(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१६.०७.२०२१
आष्टी- बीड जिल्हा परिषदेला, केंद्र शासनाकडून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त उपक्रमाव्दारे, राबवत असलेल्या नॅशनल मोबाईल मेडिकल व्हॅन युनिटची उपलब्धता झाली असून त्यात सध्या जिल्ह्यातील आष्टी २१, पाटोदा १७, शिरूर १५ या तीन तालुक्यातील, आरोग्यसेवा उपलब्ध होत नसलेल्या, अशा डोंगराळ, अतिदुर्गम ५३ गावात ही व्हॅन जात आहे. तेथील नागरिकांच्या मोफत आरोग्य तपासण्या करत आहे. याचा ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील वाड्यावस्त्यावरील नागरिकांना मोठया प्रमाणावर पुरेपूर उपयोग आणि फायदा होत आहे. याच ५३ गावापैकी सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंदाअंतर्गत असलेल्या, बांदखेल या गावात महिन्याच्या फेरीला या आठवड्यात व्हॅन आली असता, गावातील गरजू रुग्णानी या फिरत्या आरोग्य सेवेचा लाभ घेत,७६ रुग्णानी वेगवेगळ्या प्रकारचे मोफत, औषध उपचार घेत, पूरपूर फायदा होत आहे. यामाध्यमातून मिळणाऱ्या सर्व सोई सुविधायुक्त आरोग्य सेवेबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येतं आहे. या युनिटच्या माध्यमातून ४२ आजारांची तपासणी करणे शक्य असून त्यात, लसीकरण, माता बाल संगोपन, गरोदर माता तपासणी, लहान मुलांचे लसीकरण, प्रसुती, गंभीर बालकांची तपासणी निदान,उपचार, रक्तदाब, मधुमेह, किडनीचे आजार, फुफ्फुसाचे आजार, मुत्रविकार, एचआयव्ही, साथरोग नियंत्रण, किरकोळ व्यधी अधिसह आरोग्य सेवांपासून वंचित लोकांना प्राथमिक, प्रतिबंधात्मक उपचारात्मक आरोग्य सेवा उपलब्ध होत आहे. या व्हॅनमध्ये असलेल्या सुसज्ज प्रयोगशाळेत एक्स-रे, अल्ट्रासाऊंड, ईसीजी मशीन, रक्त, लघवी तपासणी, रक्तातील विविध चाचण्या, गर्भवती मातांची प्रसूतीपूर्व तपासणी यासारखी उपकरणे, तपासण्या यासह वातानुकूलित गाडीत, इमर्जन्सी प्रसूती ही यात करता येणार आहे. आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या योजना जनसामान्य माणसांपर्यंत पोहचण्यासाठी व एक्सरे पाहण्यासाठी एल ई डी असून, आर. डब्लू प्रमोशन प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या सेवा पुरवठादार संस्थेची नियुक्ती केली आहे. या अत्याधुनिक व्हॅनमध्ये प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, परिचारिका, दोन वाहन चालक आणि निरीक्षक या मनुष्यबळाच्या माध्यमातून ही मोबाईल मेडिकल व्हॅन जिल्ह्यातील गरजू , गरिब आणि दुर्गम भागातील लोकांना आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करुन देत असल्याने आरोग्य वरदान ठरत आहे. यामुळे गुणात्मक व दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार असून हे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल म्हणावे लागेल.