मुंबई(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१५.०२.२०२०
मुंबई- वैद्यकीय पदवी (एमबीबीएस) अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मिळणारी अमर्याद कालावधीची सवलत आता संपुष्टात येणार असून प्रवेश घेतल्यापासून दहा वर्षांत विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. यंदाच्या म्हणजे २०१९-२० या वर्षांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपासून हा नियम लागू होणार आहे.
वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आतापर्यंत कालमर्यादा नव्हती. साडेचार वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अगदी १२-१५ वर्षे घेणारे विद्यार्थीही आढळतात. गेल्या वर्षी वैद्यकीय पदवीचा अभ्यासक्रम बदलला. आता नव्या अभ्यासक्रम आराखडय़ानुसार विद्यार्थ्यांना दहा वर्षांत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.
यंदा प्रवेश घेतलेल्या तुकडीला (२०१९-२०) हा नियम लागू करण्यात येणार आहे. पहिल्या वर्षांचा अभ्यासक्रम चार वर्षांत किंवा पुरवणी परीक्षेसह चार प्रयत्नांमध्ये उत्तीर्ण करावा लागेल. एकूण अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी घेण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी देण्यात आला आहे. मात्र, गेल्या वर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जुनाच नियम लागू होणार आहे. जानेवारीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या नियमानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
🔹 परीक्षा वेळापत्रकांतही बदल: सध्या महाविद्यालयांमध्ये जुना आणि नवा असे दोन्ही अभ्यासक्रम सुरू आहेत. दोन अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे नियोजन करताना गोंधळ होत आहे. त्या अनुषंगाने परीक्षांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षीच्या नियमित किंवा पुनर्परीक्षार्थीच्या परीक्षा मे-जूनमध्ये होणार आहेत, तर नवीन अभ्यासक्रमाची परीक्षा सप्टेंबरमध्ये होईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.