मुंबई(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, दि.२४.०९.१९ मुंबई- देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे जनगणना केली जाणार आहे.सन २०२१ला होणाऱ्या जनगणनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. देशात २०२१ मधील सार्वत्रिक जनगणनेसाठी मोबाइल ॲपचा वापर केला जाईल असे अमित शाह यांनी जाहीर केलं आहे. कागदाचा वापर सोडून आता डिजिटल जनगणनेकडे जाण्याची वेळ आली आहे,असं दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले.म्हणजेच देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे जनगणना केली जाणार आहे.जनगणना देशासाठी विविध कारणांमुळे महत्त्वपूर्ण आहे.जनगणनेमुळे केवळ लोकसंख्याच कळते असं नाही तर आर्थिक तपशील आणि अन्य अनेक महत्त्वाची धोरणं व अन्य संसाधनांचे वाटप करण्यासाठी जनगणना अत्यंत आवश्यक आहे.जनगणनेमुळे सरकारच्या योजना नागरीकांना मिळण्यास मदत होते.राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीमुळे (एनपीआर) देशातील अनेक समस्या सुटतील, असंही शाह पुढे म्हणाले.यापूर्वी एप्रिल महिन्यात, ‘जनगणना २०२१ मधे प्रथमच माहितीचे संकलन ऑनलाइन पद्धतीने करण्याचे प्रस्तावित असून,त्याची चाचणी घेण्यात येईल अशी माहिती देण्यात आली होती.ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पार पडेल यात प्रथम टप्प्यात घरांची गणना करण्यात येईल.दुसऱ्या टप्प्यात देशातील रहिवाशांची गणना पार पडेल असं सांगण्यात आलं होतं. जनगणनेचे काम गृह मंत्रालया अंतर्गत येते.रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (आरजीआय) कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालते.डिजिटल जनगणनेचा डेटा नोंद करण्यासाठी मोबाइल वापरता येणार आहे.तसंच हा डेटा कर्मचाऱ्याला जनगणना विभागाकडे मोबाइलवरूनच हस्तांतरित करता येईल.नव्या हायटेक पद्धतीने जनगणनेचे काम वेगवान आणि अचूक व अधिक सखोल होईल असं म्हटलं जात आहे.