चंद्रपूर(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२१.०५.२०२३
⭕ शेत शिवारात वाघांचा धुमाकूळ.
⭕ वाघांची संख्या वाढली, मानवी मृ्त्यूचे काय?
चंद्रपूर- देशातील व्याघ्र संवर्धनाचा परिणाम म्हणजे नुकतीच वाघांची जाहीर झालेली आकडेवारी काय? देशात वाघांची संख्या समाधानकारक वाढली असताना चंद्रपूर सारख्या जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षात गेल्या वर्षभरात 50 हून अधिक ग्रामस्थांचे आणि शेकडो जनावरांचे मृत्यू झाले आहेत. वाघोली बुटी परिसरात मागिल काही दिवसांपूर्वी वाघांची प्रचंड दहशत निर्माण झाली.दिनांक २० मे २०२३ रोजी शेतात काम करीत असताना प्रेमीला रोहनकर या ५५ वर्षीय महिलेला ठार केले.
वाघांमुळे मानवी जिवहानी होत असुनही वनविभाग वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी अपयशी ठरले आहे.
एखाद्या व्याघ्र प्रकल्पापेक्षा अधिक वाघ ब्रह्मपुरी तालुक्यातील प्रादेशिक जंगलात आढळले आहेत. याशिवाय गेल्या काही वर्षात कोळसा खाणी, औद्योगिक क्षेत्रे ,आयुध निर्माणी यासारख्या औद्योगिक आणि मुख्यत्वे शहरी भागातही वाघांचे नवे अधिवास निर्माण झाले आहेत.
मानवी हानी होत असल्याने वाघांविरोधात नकारात्मक भावना निर्माण होत आहे. ज्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात हजारो रुपये खर्च करून पर्यटक व्याघ्र सफारीसाठी येतात, त्याच वाघाचे ग्रामीण भागात लाठ्याकाठ्यांनी वागणूक द्यावी लागते.
चंद्रपुरात दर महिन्याला वाघांची वाढती संख्या, त्यांच्यासाठीचे घटते जंगल, अतिक्रमण झालेले भ्रमण मार्ग याविषयी वनविभाग व प्रशासकीय पातळीवर व्यापक प्रयत्नांची गरज आहे. त्याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होतो.
वाघाला पाहण्यासाठी जंगलात गर्दी केली जाते. हाच वाघ गावात येतो तेव्हा आक्रोश निर्माण होतो. शिवारात वाघ आल्यास लाठ्या- काठ्यांनी त्याचे स्वागत होते. हे निर्माण झालेलं चित्र बदलण्याची गरज आहे.
कोरोना सदृश्य परिस्थिती गेल्या कित्येक दिवसांपासून वाघ्र प्रकल्पाजवळील गावांमध्ये आहे. संबंधित गावकरी, शेतकरी यांचे अनेक प्रश्न आहेत. वाघ-मानव संघर्षात नकारात्मक भावना वाघाच्या बदद्ल निर्माण झाली आहे. ही समस्या सरकारी पातळीवर सोडवली गेली पाहिजे.
वाघांचे स्थलांतर एका जंगलातून दुसऱ्या जंगलात होणे थांबले आहे. भ्रमणमार्गात विकासकामं झालीत. त्यामुळे वाघांसाठी अंडरपास किंवा ओव्हरपास मार्ग हवा आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.