नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२९.०५.२०२०
नाशिक- शेतकऱ्यांना खरिपात कर्जवाटप करण्याचे शासनाने आदेश दिल्यानुसार जिल्हास्तरीय यंत्रणा आणि बॅकांद्वारे त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज देण्याचे आदेशही दिले. पण आता पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लाभ दिला नसल्याने अन् राज्य शासनाकडून त्याबाबतचे आदेशही मिळाले नसल्याने केवळ कर्जमुक्तीस पात्र शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्याची संपूर्ण तयारी यंत्रणेकडून केली जाणार असून, शासन आदेश येताच अंमलबजावणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी खरिपात कर्जमुक्तीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना लाभ जरी मिळणार असला तरीही शासन आदेशाची वाट पहावी लागणार आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली होती. त्यानंतर मार्चनंतर त्याचा लाभ मिळण्याची अपेक्षा असताना कोरोना संकटामुळे कर्जमुक्तीचा प्रत्यक्षात लाभही मिळाला नाही. नाशिक जिल्ह्यातील तब्बल एक लाख ३७ हजार पात्र शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. पण आता खरीप हंगाम एक – दोन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे . अजूनही कर्जमुक्ती झाली नसल्याने बॅकांनी थकीत कर्जदारांना अद्यापही नव्याने कर्ज दिलेच नाही. अशा स्थितीत या शेतकऱ्यांना कर्जाची आवश्यकता आहे. नाशिक जिल्ह्यात ३३०० कोटी उद्दिष्टापैकी १३१ कोटी पीककर्जाचेच शेतकऱ्यांना वाटप झाले आहे. हे कर्जही कर्जमाफीचे लाभार्थी नसलेल्या शेतकऱ्यांचाच अधिक समावेश आहे. परंतू अद्यापही जवळपास ३१०० कोटी रुपये वाटप करावयाचे आहे. परंतू कर्जमुक्तीचा लाभच प्रत्यक्षात मिळाला नसल्याने त्या शेतकऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या कर्ज देण्यास अडचण आहे. त्यामुळे आता कर्जमुक्तीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून आदेश मिळतच कर्जमुक्त करुन नवीन कर्ज दिले जाईल. त्यासाठी आवश्यक तेवढी संपूर्णप्रक्रिया पूर्ण करून ठेवली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. दरम्यान सर्वच शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी कुठलीही चिंता करू नये, त्यांनी शेतीची कामे करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे .



















