मुंबई(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी ,
दि.१४.०२.२०२०
मुंबई- राज्यातील शेतकऱ्यांच्या सातबारा व खाते उताऱ्याचे ऑनलाईन काम जलद गतीने सुरू असून ते अंतिम टप्प्यात आले आहे. ते तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना कोणत्याही कामासाठी बँकेत किंवा शासकीय कार्यालयात सात बारा घेऊन फिरण्याची गरज लागणार नाही. शेतकऱ्यांचे ज्या कार्यालयात काम आहे ते कार्यालय संबधित शेतकऱ्यांचा सातबारा ऑनलाईन उपलब्ध करून घेईल. याबाबतचा शासकीय निर्णय लवकरच निघेल अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
कडेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात बोलत होते. यावेळी कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम, काँग्रेसचे ज्ये ष्ठ नेते आमदार मोहनराव कदम, सांगली शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे महापूर, अवकाळी व अतिवृष्टीने कोट्यवधी रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. महाविकास आघाडी सरकार याबाबत या सर्व शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहे. सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करीत आहे. शेतकऱ्यांना मदत व नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, त्यामध्ये काही अडचणी होत्या. त्या सोडविण्यासाठी जिल्हा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा सूचना दिल्या आहेत.
पुढे ते म्हणाले, जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेले क्षेत्र व शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. यासाठी राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम हे प्रयत्नशील आहेत. तसेच याबाबत गावावर आढावा घेऊन मदतीपासून कोणी वंचित राहू नये यासाठी १८ रोजी जिल्हाधिकारी सांगली येथे जिल्हाधिकारी बैठक घेतील. तर सांगली येथे स्वतंत्र तालुका व्हावा अशी गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. परंतु येथे तालुका निर्मिती करण्यासाठी लवकरच धोरणात्मक निर्णय घ्यावा लागतो. तेव्हा सांगली तालुका निर्मितीसाठी धोरणात्मक निर्णय घेवू, असे थोरात यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संपर्कमंत्री नेमले आहेत.जिल्ह्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासनाला विविध समित्या कराव्या लागतात. तेव्हा संपर्क मंत्री, जिल्हा समित्या व पालकमंत्री एकत्र बसून निर्णय घेतील. यामुळे जिल्ह्यातील विविध समस्या सोडवण्यास चांगलीच मदत होईल. तसेच संपर्कमंत्री पदामुळे पक्ष वाढीसाठीही मोठी मदत होणार असल्यािचे बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.
🔹महसूलच्या रिक्त जागांची भरती प्रक्रिया लवकरच
राज्यातील महसुल विभागात मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत.त्यामुळे शासकीय कामे पेंडिंग पडत आहेत. कामाचा निपटारा होत नाही. तेव्हा राज्यातील महसूलच्या रिक्त जागा भरण्याबाबत लवकरच निर्णय घेऊन भरती प्रक्रिया सुरु केली जाईल.
🔹मी तर पाहुणा…
आम्ही नाही तर मग कुणीच नाही, हा सांगलीमधील काँग्रेसमधील ट्रेंड घातक आहे, असे शरद पवार यांनी सांगत काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीवर टोला लगावला होता. याबाबत महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पत्रकारांनी विचारले असता, मी तर पाहुणा आहे, मला काय विचारता असे सांगत त्यांनी आपली बाजू काढून घेतली.



















