मुंबई(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२६.०३.२०२०
मुंबई- केंद्र सरकार ८० कोटी लोकांना २७ रुपये किलोचा गहू २ रुपये किलोने देणार तर ३७ रुपये किलोचा तांदूळ ३ रुपये किलोने देणार अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. सरकारी संस्थांमध्ये जे कंत्राटी कामगार आहेत त्यांनाही पगार दिला जाईल. खासगी कंपन्याही यासाठी सकारात्मक आहेत. असंही जावडेकर यांनी स्पष्ट केलं. अवघ्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाउनचा निर्णय मान्य केला. आज पत्रकार परिषदेतही सोशल डिस्टसिंग पाळण्यात आलं ही चांगली गोष्ट आहे. १३० कोटी जनतेच्या सुरक्षेसाठी हा लॉकडाउन आवश्यक होता असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. करोनाशी लढण्यासाठी तीन ते चारच उपाय आहेत. घरातच थांबा, काहीही काम केलं की हात धुवा, ताप, सर्दी, खोकला वाढला तर लगेच डॉक्टरांकडे जा. तसंच सोशल डिस्टसिंग हे मोजकेच उपाय आहेत. ते सगळ्यांनी अवलंबावेत असंही जावडेकर यांनी म्हटलं आहे. आजपर्यंत जगभरात १६ हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. ही बातमी निश्चितच चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे थोडा त्रास झाला तर तो सहन केला तो आवश्यक आहे.
आवश्यक सेवांची दुकानं बंद होणार नाहीत. दूध, किराणा, रेशन, पशूचारा, भाजीपाला हे सगळी दुकानं सुरु राहणार आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांसोबत राज्य सरकारं आहेत असंही जावडेकर यांनी स्पष्ट केलं.



















