मुंबई(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०१.०४.२०२०
मुंबई- जगभरात कोरोनाने थैमान घातले असून भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. याच दरम्यान दिल्लीत झालेल्या एका धार्मिक संमेलनात सहभागी झालेल्या दोन हजारांपेक्षा अधिक लोकांमुळे कोरोनाचे लोण देशाच्या अनेक राज्यांत पसरले असल्याची शक्यता समोर आली आहे. यामध्ये सहभागी झालेल्यांपैकी काही जणांचे मृत्यू झाले आहेत. आणखी २०० जणांमध्ये प्राथमिक लक्षणे दिसू लागल्याने या आजाराचा धोका आणखी वाढला आहे. देशात कोरोनामुळे भीतीचे वातावरण असताना तबलीग जमात आणि मरकज चर्चेचा विषय ठरला आहे. याच दरम्यान या जमातीच्या एका मौलवींचा एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
‘मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा नाही’ असं वक्तव्य मरकजचे अध्यक्ष मौलाना साद यांनी व्हायरल ऑडिओमध्ये केले आहे. तसेच अशा पद्धतीनं मशिदीत एकत्र जमण्यामुळे आपल्यासोबतच अनेकांच्या जीवाला धोका असल्याची पूर्वकल्पना त्यांना होती, असंच या ऑडिओ क्लीपवरून दिसून येत आहे. व्हायरल झालेल्या ऑडिओमध्ये मौलाना साद यांचा आवाज ऐकू येत आहे. तसेच या दरम्यान काही लोक खोकतानाही ऐकू येत असून त्याकडे लक्ष दिलं नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे.
‘मशिदीमध्ये जमा होण्यानं आजार होईल, हा विचारही मूर्खपणाचा आहे. तुम्हाला मशिदीत येण्यानं व्यक्ती मरेल असं दिसत असेल तरी मी तर म्हणतो की, मरण्यासाठी यापेक्षा चांगली जागा असून शकत नाही’ असं मौलाना साद यांनी व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये म्हटल्याचं दिसत आहे. ‘अल्लाहवर विश्वास ठेवा. कुराण वाचत नाहीत आणि वर्तमानपत्रं वाचतात आणि घाबरून पळत सुटतात. अल्लाह यासाठीच काहीतरी अडचणी निर्माण करतो, कारण त्याला पाहायचं असतं की अशा परिस्थितीत माझा बंदा काय करतो? जर कुणी म्हणत असेल की मशिदी बंद करायला हव्यात, टाळे लावायला हव्यात कारण हा आजार वाढत जाईल तर हा विचार तुमच्या मनातून काढून टाका’ असंही मौलाना साद यांनी यामध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. दिल्लीतील निजामुद्दीनमधील मरकजमधून तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये आलेल्या लोकांची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. तेलंगणामध्ये १९४ लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर तामिळनाडूमध्ये ९८१ लोकांची वैद्यकीय तपासणी करण्याचे काम सुरू आहे. मरकजमध्ये जवळपास २००० हून अधिक लोक उपस्थित राहिले होते. ज्यामध्ये विदेशी नागरिकांचाही समावेश होता. विदेशींमध्ये जास्तकरून मलेशिया आणि इंडिनेशियाचे नागरिक आहेत. दिल्लीत येण्याआधी हा ग्रुप २७ फेब्रुवारी ते १ मार्चच्या दरम्यान मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमधील एका धार्मिक कार्यक्रमात सामील झाला होता. यामधील काही लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे प्रशासनाला समजल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.



















