मुंबई(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२२.०२.२०२०
मुंबई- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी शिक्षण व्यवस्थेसंदर्भात चर्चा केली. या चर्चेनंतर उदय सामंत म्हणाले की, दिल्लीतील शैक्षणिक व्यवस्थेमुळे प्रभावित असून महाराष्ट्र देखील दिल्ली पॅटर्न राबवून शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.
या दोन्ही नेत्यांमधील शैक्षणिक व्यवस्थेसंदर्भातील चर्चेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्राला आवश्यक असणारे सहकार्य करण्यास केजरीवाल सरकार तयार आहे, असा उल्लेखही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांच्यासोबतच्या चर्चेनंतर सामंत म्हणाले होते की, दिल्ली सरकार आणि महाराष्ट्र सरकार शिक्षणाच्या मुद्यावर एकत्र काम करणार आहोत. दोन्ही राज्यांतील शैक्षणिक व्यवस्था सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. शिक्षणाच्या मुद्यावर एकत्रित काम करणे हा संघवादाचा एका उत्तम नमुना असेल. दोन्ही राज्यांना एकमेकांकडून खूप काही शिकायला मिळेल, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळवत सत्ता कायम राखण्यात यश मिळवले आहे. अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपने स्थानिक मुद्यांवर भर दिला होता. त्यात शैक्षणिक मुद्द्यालाही प्रमुख स्थानी होता. जनताने त्याला पसंतीही दिली. महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये दिल्ली पॅटर्न राबवण्यासाठी राज्य सरकार उत्सुक आहे. केजरीवालांनी याच स्वागत केले आहे.



















