पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, कलिंदर शेख
दि.०९.०७.१९
पिंपरी- आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून दाखल होणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी द्यावी, अशी लेखी मागणी मा. शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख तथा शिवशाही व्यापारीसंघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर विठु माऊलीच्या दर्शनासाठी दरवर्षी राज्यभरातून हजारो वारकरी पंढरपुरात दाखल होतात. आषाढी एकादशीची ही परंपरा महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीचे अविभाज्य अंग आहे.
यंदाही १२ जुलै रोजी येणाऱ्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातुन वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत. त्यामुळे या वारकऱ्यांच्या वाहनांना एकादशीच्या काळात टोलमाफी देण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री, रस्ते व विकास मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे लेखी पत्राद्वारे युवराज दाखले यांनी ही मागणी केली आहे.दाखले यांच्या या मागणीमुळे पंढरपूरला जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांना या सुविधांचा लाभ घेता येणार आहे.



















