मुंबई(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२९.०३.२०२१
मुंबई- आपल्या राज्यात सर्वाधिक करोना आजाराचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारकडून लॉकडाऊन करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहे.
या लॉकडाऊनला आमचा विरोध असणार असून लॉकडाउन हा पर्याय नाही. एक वर्ष लोकं कसे जगले हे मातोश्रीमध्ये राहून समजणार नाही,” असा टोला महाराष्ट्र भा.ज.पा.चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
“पूर्वी कसे राजे वस्त्यांमध्ये जाऊन राजा कपडे बदलून फिरायचा तसं फिरावं लागेल.
तुम्ही मुख्यमंत्री म्हणून फिरला की तुमच्या सोबत ताफा असेल.
त्यामुळे लोक तुमच्याशी लोक मनमोकळं बोलणार नाहीत,” अशा शब्दात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर पाटील यांनी निशाणा साधला. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतल्यानंतर पाटील यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी लॉकडाऊन जारी करण्याआधी हातावर पोट असणाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार देण्याचीही मागणी केली.
राज्यामध्ये रात्री आठ ते सकाळी सात दरम्यान जमावबंदीचे आदेश लागू करण्यावरुनही पाटील यांनी राज्याचे पर्यटनमंत्री आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय.
“आता नाईट कर्फ्यु लागू केला. ते आम्हाला मान्य आहे.
रात्री कोणाला फिरायचे असते. ज्यांना फिरायचं असतं ते तुमच्या सोबत असतात. त्यांना नाईट लाईफ हवं असतं.
सर्व सामन्यांना नाईट लाईफ नको असतं, त्यांना सातच्या आत घरात चालतं,” असं म्हणत आदित्य ठाकरे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. “दोन-तीन महिन्यात सर्व पूर्वपदावर येत होते.
आता लॉकडाउन करणे योग्य ठरणार नाही. तसे करायचे झाल्यास, राज्य सरकारने हातावर पोट असलेल्या साधारण एक कोटी नागरिकांना प्रत्येकी पाच हजार द्यावेत,” अशी मागणी पाटील यांनी केली आहे.



















