पुणे (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
दि.०७.०१.२०२०
पुणे- आंदोलनांचं शहर म्हणून, ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरात सध्या एक वेगळंच आंदोलन गाजतंय. मटणाच्या वाढलेल्या दरांवरून स्थानिक खवय्यांना आंदोलन छेडले असून, थेट जिल्हाधिकाऱ्यांना यात हस्तक्षेप करावा लागत आहे. पण, मटणाचे वाढते दर, हा केवळ कोल्हापूर शहरापुरता मर्यादित विषय राहिलेला नाही तर, संपूर्ण महाराष्ट्रात मटणाचे वाढते दर, नॉन व्हेज प्रेमींसाठी चिंतेचा विषय बनला आहे. पण, या वाढत्या दरांमागं कारणं काय आहे?, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
🔹 कोठे वाढली मागणी?
गेल्या काही महिन्यांपासून दक्षिण भारतातील मोठ्या शहरांमधून महाराष्ट्रातील मटणाला मागणी वाढली आहे. बेंगळुरू, चेन्नई सारख्या मोठ्या शहरांमध्ये लोकसंख्येमुळं मांसाहाराला असलेली वाढती मागणी आणि महाराष्ट्रातील मटणाचा दर्जा यांमुळं दक्षिणेतील खाटिक व्यवसायिकांनी महाराष्ट्राकडं मोर्चा वळवलाय. गेल्या पाच वर्षांपासून ते महाराष्ट्रात येत असले तरी, गेल्या काही महिन्यांत त्यांनी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातील जनावरांच्या बाजारपेठांमधून शेळ्या मेंढ्या उचलण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील काही शहरांमध्ये तसेच बेंगळुरू आणि चेन्नई या दक्षिणेतील महानगरांमध्ये सध्या ६४० रुपये किलो दराने मटण विक्री सुरू आहे. या परराज्यातील मटण विक्रेत्यांवर बंदी घालण्याची मागणी स्थानिक मटण विक्रेते राज्य सरकारकडे करत आहेत.
🔹एकावेळी ७०० बकरी नेणारे केंटेनर!
कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव, पुणे जिल्ह्यात चाकण, नगर जिल्ह्यातल काष्टी, साताऱ्यातील नागठाणे, कऱ्हाड आणि सांगली जिल्ह्यातील आटपाडी, मिरज, माडग्याळ, येथे आठवड्याला भरणाऱ्या बाजारातून दक्षिणेतील खाटिक व्यवसायिक मोठ्या प्रमाणावर जनावरे घेऊन जात आहेत. महाराष्ट्रात खाटिक व्यवसायिकांच्या एका गाडीत ६० ते ७० बकरी बसतात. दर दक्षिणेतील हे व्यवसायिक एकावेळी ७०० जनावरे घेऊन जाता येतील, असे कंटेनर घेऊनच बाजारात येत आहे. दक्षिणेतील या खाटिक व्यवसायिकांनी काही बाजारांमध्ये आपले दलाल नेमल्याची माहिती आहे. त्यांच्या मार्फत केवळ एका फोनवर जनावरांचे कंटेनर भरले जातात. केवळ पश्चिम महाराष्ट्रातीलच नव्हे तर, अगदी घोडेगाव, काष्टी (नगर जिल्हा) येथील बाजारांपर्यंत आपली पावलं टाकली आहेत. त्यामुळं ग्राहकांची मागणी जास्त आणि बकरी कमी, अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच बाजारांमध्ये दिसू लागली आहे. त्यामुळं बकऱ्यांचे दर वाढले आणि परिणामी शहरांतील बाजारांत मटणांचे दर वाढले आहेत.



















