मुंबई(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२९.०३.२०२१
मुंबई- पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात एका दुर्देवी घटनेमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झालाय. मोखाड्याजवळील ब्राह्मण गाव येथील एका घर आणि दुकानाला लागलेल्या आगीमध्ये मौळे कुटुंबातील चार जणांची होरपळून मृत्यू झाला. ब्राह्मण गावमधील अनंता मौळे यांच्या मालकीच्या घराला आणि दुकानाला रात्री अडीचच्या सुमार आग लागली. शॉट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीच्या मोठ्या ज्वाला आणि धूर दिसू लागल्यानंतर गावकरी मदतीला धावले.
रात्री आग लागल्यामुळे घरातील सर्वच सदस्य झोपेत होते.
ही आग लागल्यानंतर घरातील काही सदस्यांना बाहेर पडण्यात यश आलं तर काही जणांचा यामध्ये होरपळून मृत्यू झाला.
मरण पावलेल्यांमध्ये अनंता मौळे यांची आई गंगुबाई मौळे, पत्नी द्वारका मौळे, १५ वर्षांची मुलगी पल्लवी मौळे आणि दहा वर्षांचा मुलगा कृष्णा मौळे यांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या दुर्देवी घटनेमध्ये अनंता मौळे आणि त्यांची दोन मुलं वाचली आहेत. १२ वर्षीय भावेश आणि १७ वर्षीय अश्विनी यांच्यावर नाशिकमधील दवाखान्यामध्ये उपचार सुरु आहेत.
या दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे. तर घर मालक अनंता यांच्या डोक्याला दुखापत झाली असून ते मोखाडा येथे उपचार घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.



















