मुंबई(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०३.०३.२०२०
मुंबई- शेतकरी कर्जमाफी योजना लवकरच पूर्ण करु. शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर पैसे ट्रान्सफर होण्यास सुरुवात झाली आहे. डिसेंबरच्या अधिवेशनापर्यंत २ लाखांपर्यंतचे कर्जमुक्त केले जाईल. तसंच ५ लाखांपर्यंतची यादी आमच्याकडे तयार आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची मुंबईमध्ये पत्रकार परिषद झाली यावेळी ते बोलत होते.
सरकार शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्जमाफ करणारच आहे. सध्या १० लाख शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले आहे. ७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत.’, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच, ‘गेल्या दोन महिन्यात कर्जमाफीची पहिली यादी जारी केली. दुसरी यादी सुद्धा जारी करण्यात आली. विदर्भातील पाच लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी तयार आहे. मात्र गडचिरोली, अमरावती, नंदुरबार जिल्ह्यांतील स्थानिक निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे ही यादी जाहीर केली नाही.’, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंट बंद करण्याच्या निर्णयाबाबत विचारले असता त्यांनी यावर बोलणे टाळले. नरेंद्र मोदी मोठे बंधू आहेत त्यांच्याबाबत मी बोलणार नाही, असे त्यांनी सांगितले. तसंच, सीएए आणि एनआरसीमुळे राज्यातील एकाही नागरिकाचे नागरिकत्व हिरावू देणार नाही, असे आश्वासन त्यांनी यावेळी जनतेला दिले. यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची समिती तयार करुन यावर भूमिका ठरवणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.



















