डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानवतेच्या कल्याणाचा विचार आहे, वंचित घटकांना न्याय देण्यासाठी बार्टी काम करेल- धम्मज्योती गजभिये
पुणे(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१५.०४.२०२१
पुणे- डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नेते होते, असा अपप्रचार करण्यात आला. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील सर्वासाठी काम केले. मी प्रथम माझ्या देशाला प्राधान्य देईल, असे ते म्हणत असत . सर्व विश्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महती मान्य केली. संपूर्ण जगात त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होते. कोलंबिया विश्वविद्यापीठाने त्यांना ज्ञानाचे प्रतीक म्हणून गौरव केला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा मानवतेच्या कल्याणाचा विचार आहे. आज डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार व प्रचार जोमाने होत आहे. त्यांचे विचार आपण आचरणात आणावे त्यांनी या देशाला सर्वश्रेष्ठ संविधान दिले. त्यांच्या विचारांचा वारसा बार्टी पुढे नेत आहे असे प्रतिपादन धम्मज्योती गजभिये महासंचालक बार्टी पुणे यांनी व्यक्त केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी ,पुणे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर १४ एप्रिल २०२१ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ऑनलाइन पद्धतीने साजरी करण्यात आली. या जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी धम्मज्योती गजभिये होते. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आपण लहान आहोत असे न समजता, कोणीही कमजोर नाही .आपण स्वतः पासुन बदल घडू शकतो. बार्टी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार पुढे नेत आहे. शिक्षण, शेती ,पाणी, याविषयावर बार्टी संशोधन करेल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तकांत बंद असलेले विचार बार्टी पुढे नेईल. दलित शोषित पीडित उपेक्षित वंचित नव्हे तर सर्वांना न्याय देण्यासाठी बार्टी काम करत आहे.
“आजची परिस्थिती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार” या विषयी ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत उत्तम कांबळे यांनी ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन केले. ते म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी काळा राम मंदिराचा सत्याग्रह केला. चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. त्यांना आम्ही पण माणसे आहोत हे सांगायचे होते. त्यांच्यामुळेच देशाला राज्यघटना मिळाली. सामाजिक न्यायाचे हक्कदार झालो. या देशात ८० टक्के लोक आजही शेतीवर अवलंबून आहेत. ४० टक्के लोक हे अल्प भुधारक आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मजूर मंत्री असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घातला होता. खोती आंदोलन, शेतीचा विकास करायचा असेल तर शेतकऱ्यांना माहिती तंत्रज्ञानाकडे न्यावे लागेल. शेतीचे राष्ट्रीयीकरण करावे म्हणून त्यांनी संकल्पना मांडली होती. औद्योगिकरणाची गती वाढवावी लागेल. असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मत होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी खेडी सोडून शहराकडे जावे, असा मोलाचा संदेश दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जलसाक्षरतेचे जनक होते. या देशातील नद्याजोड प्रकल्प अमलात आला पाहिजे. धरणे बांधली पाहिजेत, पाणी लवाद, जलवाहतूक ही संकल्पना त्यांनीच मांडली. शिक्षण नसेल तर माणूस गुलाम बनतो. हजारो वर्षापासून शिक्षणापासून वंचित असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शिक्षण दिलेच पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते. वंचित घटकातील मुलांना बार्टी उच्च शिक्षण देत आहे. हे गौरवास्पद असल्याचे उदगार त्यांनी काढले. ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध पैलूवर प्रकाश टाकला. तत्पूर्वी, जयंती निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ.प्रशांत नारनवरे, आयुक्त समाज कल्याण , महाराष्ट्र राज्य, धम्मज्योती गजभिये महासंचालक बार्टी पुणे, उमेश घुले, निबंधक बार्टी पुणे, आदी उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी ,पुणे येथील मुख्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला धम्मज्योती गजभिये, महासंचालक बार्टी पुणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उमेश घुले, उपायुक्त तथा निबंधक बार्टी पुणे, श्रीमती दीप्ती सूर्यवंशी, उप जिल्हाधिकारी तथा योजना विभाग प्रमुख रवींद्र कदम, उपायुक्त तथा जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती विभाग प्रमुख, श्रीमती स्वाती मोकाशी लेखाधिकारी व बार्टीतिल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
ऑनलाइन जयंती महोत्सवात झूम मीटिंग द्वारे बार्टी फेसबुक पेजवर बार्टीतील अधिकारी-कर्मचारी, तालुका समन्वयक, राज्यातील सर्व समतादुत, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी ऑनलाइन पद्धतीने जॉईन होऊन या जयंती सोहळ्याचा लाभ घेतला, या ऑनलाईन जयंती सोहळास उमेश घुले निबंधक बार्टी पुणे यांनी प्रास्ताविक करुन शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन सुमेध थोरात, प्रकल्प व्यवस्थापक यांनी केले, तर ऑनलाईन जयंती सोहळ्याचे आभार नितीन सहारे प्रकल्प व्यवस्थापक यांनी मानले.