सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०८.०६.२०२१
महाबळेश्वर- मार्च २०१९ पासून कोविडच्या संकटामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाले तेव्हापासून गेली वर्षभरापेक्षाही जास्त काळ लोटून गेला तरी देखिल महाबळेश्वरचा पर्यटन व्यवसाय पुर्णतः बंद अवस्थेत आहे. महाबळेश्वरची बहुसंख्य लोकसंख्या ही पर्यटन व्यवसायावरच अबलंबून आहे.येथे येणाऱ्या पर्यटकांवरच महाबळेश्वरच्या जनतेची संपुर्ण अर्थव्यवस्था अवलंबुन आहे.परंतु सद्यस्थितीत पर्यटन पूर्णतः बंद असल्याने महाबळेश्वरच्या जनतेचे आर्थिक अडचणींमुळे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. महाबळेश्वर तालुक्यामध्ये सध्या पुर्ण कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली आहे. या परिस्थितीचा विचार करता येथील नागरिकांच्या जीविताचे रक्षण व्हावे म्हणुन येथील पर्यटन व्यवसाय चालू होणे अतिशय आवश्यक आहे. महाबळेश्वरमध्ये ४०० च्या वर नोंदणीकृत टॅक्सी व्यावसायिक आहेत. २०० च्या वर नोंदणीकृत घोडा व्यावसायिक आहेत. त्यांच्या माध्यमातून दरवर्षी शासनास व नगर पालिकेस महसूल प्राप्त होतो. शेकडोच्यावर गाईड व कॅन्व्हासर्स आहेत. हॉटेलमध्ये शेकडो कामगार आहेत. हे सर्वजण केवळ आणि केवळ पर्यटणावर अवलंबून आहेत.सदरील सर्व घटक हे महाबळेश्वरचा पर्यटन व्यवसाय बंद असल्यामुळे खुप मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.सध्या महाबळेश्वरच्या नागरिकांना ”जगावे कसे ?” हा एकच प्रश्न पडला आहे. शासनाने ज्याप्रमाणे राज्यात रिक्षावाले व काही घटकांना आर्थिक मदत दिली आहे त्याच धर्तीवर महाबळेश्वरच्या टॅक्सीवाले, घोडावाले, पथारीवाले, हॉकर्स व हॉटेल कामगार यांना दर महिना ५००० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी व त्यांना मोफत व सुरळीत रेशन पुरवठा करावा तसेच महाबळेश्वरचा पर्यटन व्यवसाय तात्काळ चालू करावा अशी मागणी करणारे लेखी निवेदन बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक किरण शिंदे यांनी तहसीलदार कार्यालय महाबळेश्वर व नगरपालिका मुख्याधिकारी सौ. पल्लवी पाटील यांची भेट घेऊन दिले आहे.
महाबळेश्वरचा नागरिक रोजगाराअभावी अतिशय अडचणीत असुन शासनाने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास सदर मागण्यांसाठी तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही या निवेदनात किरण शिंदे यांनी दिला आहे.याप्रसंगी फारुखभाई वारुणकर,शफीक महापुळे उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती पोस्टाने मुख्यमंत्री, पर्यटन मंत्री, जिल्हाधिकारी यांना पाठविल्याची माहितीही किरण शिंदे यांनी यावेळी दिली आहे.