🌑चौथ्या दिवशी हजारो संगणक परिचालकांचे आंदोलन स्थगित!
मुंबई (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, विकास खोब्रागडे
मुंबई, राज्यातील ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळात सामाऊन घेण्याच्या एकाच मागणीसाठी संगणकपरिचालकांचे आंदोलन मागील ४ दिवसापासुन आजाद मैदान येथे सुरू होते,त्यावर संघटने च्या शिष्टमंडळा सोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की हा धोरणात्मक निर्णय असून येत्या १० दिवसात बैठक घेऊन निर्णय देण्यात येईल,त्यांनी विधानपरिषदेत दिलेल्या उत्तरानुसार आंदोलन स्थगित करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त की राज्यातील आपले सरकार मध्ये काम करून मागील ७ वर्षात डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून कायम स्वरूपी सामावून घ्यावे या मागणीसाठी मुंबई येथील आजाद मैदानावर मागील ४ दिवसापासून रात्रंदिवस आजाद मैदानावर आंदोलन सुरू होते.या आंदोलनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ,विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे,पर्यावरणमंत्री रामदास कदम,बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व पक्षाच्या सुमारे ८२ आमदारांनी आंदोलनस्थळी भेट दिली होती,आज आंदोलनाच्या ४ था दिवशी विरोधीपक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी या प्रश्नावर उपस्थित केलेल्या लक्षवेधी ला उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की आय टी महामंडळात सामावून घेण्याचा निर्णय धोरणात्मक असून येत्या १० दिवसात बैठक घेऊन निर्णय देण्यात येईल असे सभागृहात सांगितले.त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून पर्यावरणमंत्री ना.कदम कदम यांनी विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्या दालनात मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत संघटनेच्या शिष्टमंडळा सोबत बैठक लावली त्यावेळी संघटनेच्या वतीने संगणक परिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र आय टी महामंडळात नियुक्ती देण्याचा निर्णय पाहिजे आश्वासन नको त्यावेळी मुख्यमंत्री यांनी सांगितले मी सभागृहात उत्तर दिले आहे यावेळी १० दिवसात बैठक घेऊन नक्की निर्णय देईल याबाबत सविस्तर चर्चा झाली. याबैठकीस माजीमंत्री एकनाथ खडसे,आमदार सुभाष साबणे,संघटनेचे सिद्धेश्वर मुंडे, मयूर कांबळे ,विजयकुमार वाघ,मुकेश नामेवार,प्रकाश कांबळे उपस्थित होते. बैठकीत झालेल्या चर्चे नुसार ग्रामविकास राज्यमंत्री ना.दादा भुसे यांनी आंदोलन स्थळी येऊन भेट दिली त्या वेळी संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेच्या रेकॉर्ड वर दिलेले उत्तर व येत्या १० दिवसात निर्णय देण्याचा शब्द दिला त्यानुसार आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले त्यावेळी उपस्थित हजारो संगणकपरिचालकांचे सुरू असलेले आंदोलन स्थगित केले.
🌑पोलिसांनी सोडला सुटकेचा निःश्वास
आजाद मैदानाच्या इतिहासात पहिलांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येत असलेले आंदोलक संगणकपरिचालक यांनी दिवसरात्र २४ तास आंदोलन केले.त्याच ठिकाणी रात्रभर झोपणे,जेवणे तिथेच केले आजाद मैदानावर रात्रंदिवस आंदोलन सुरू असल्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती त्यात अनेक वेळा पोलीस व आंदोलका मध्ये दररोज संघर्षाची वेळ येत होती परंतु आंदोलकांच्या एकजुटीमुळे पोलिसांना नमते घ्यावे लागत होते.
🌑अनेक अडचणींचा सामना करत आंदोलकांनी धैर्याने आंदोलन सुरू ठेवले!
संगणकपरिचालकांचा मोर्चा भायखळा राणीबाग ते आजाद मैदान असा निघणार होता परंतु मागील २५ जुलै २०१६ रोजी दक्षिण मुंबई जाम केल्यामुळे आणि यावेळी ट्विटर मोर्चामुळे सोशल मीडियावर संगणक परिचालक आक्रमक झाल्यामुळे २७ रोजी मुंबई पोलिसांनी संगणकपरिचालकांना सी एस टी रेल्वे स्टेशन,आमदार निवास,विधानभवन परिसरातून ताब्यात घेणे सुरू केले तसेच राणीबागेत हजारो संगणकपरिचालकांना बंद केले.यामुळे पोलीस अधिकारी व सिद्धेश्वर मुंडे यांच्यामध्ये राणीबाग परिसरात बाचाबाची झाली त्यावेळी राणी बागेला छावणीचे स्वरूप आले होते.त्यानंतर आजाद मैदानात पेंडॉल टाकण्यास परवानगी न दिल्यामुळे दिवसभर उन्हात थांबून ४ दिवस आंदोलन केले.



















