ठाणे(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि. १३-०५-२०२३
ठाणे- देशाचा आत्मा म्हणजेच देशाचे सविंधान की ज्यामुळे हजारो जाती- धर्माचे लोक मागील ६६ वर्षापासून देशात गुण्यागोविंदाने नांदत आहेत. देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात, त्याला संविधान असे म्हणतात. याचाच अर्थ संविधान म्हणजे देशाच्या राज्यकारभारासंबंधीच्या तरतुदींचा लिखित दस्तऐवज होय. अगदी ग्रामपंचायतीच्या पासून ते संसदेपर्यंत सर्वोच्च सर्वच शासकीय व यंत्रणा या संविधानानुसारच चालवतात. सर्व शासकीय व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना पण संविधानानुसारच जबाबदाऱ्या पार पाडणे बंधनकारक आहे. एवढेच नव्हेतर तालुका न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वच न्यायालयांचे निर्णय देखील याच संविधानाच्या चौकटीत असतात.
एवढे महत्त्वाचे असलेले हे कायदेशीर दस्तऐवज प्रत्येक जबाबदार भारतीय नागरिकांनी जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. परंतू वास्तवात मात्र प्रत्येक भारतीय हा भारतीय नागरिक म्हणून मिळणारे सर्वच लाभ हे केवळ संविधानामुळेच उपभोगतो आहे. याच बाबींची जाणीव अनेक सामाजिक कार्यकर्ते समाजातील विविध घटकांना करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
ठाणे जिल्हयातील नारीवली येथील इंटरनॅशनल ह्युमन राइट्स कमिशनच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव अंजली हरिश्चंद्र भोईर या ओबीसी समाजातील एका स्त्रीने आपल्या दोन्ही मुलांच्या लग्न सोहळ्यात हळदीदरम्यान आलेल्या पाहुण्यांना मानपान म्हणून साडी चोळी देण्याऐवजी भारतीय संविधानाचे साध्या, सोप्या भाषेत विश्लेषण करणारे संविधान अभ्यासक नुरखॉं पठाण लिखित ‘आपले संविधान.. राज्यपध्दती नव्हेतर जीवनपध्दती ‘ हे प्रसिध्द पुस्तक देऊन आपल्या समाजात संविधानातील आदर्श मूल्यांची ओळख करून देण्यासाठी एक क्रांतीकारी पाऊल उचलले आहे.
एक महिला आणि ती पण ओबीसी समाजाची! असे असूनही क्रांतीकारी सुरूवात केल्याबद्दल संपूर्ण परिसरातून अंजली भोईर यांचे विशेष कौतुक होत आहे. यासाठी ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते गोरख राजगुरू यांनी पुढाकार घेऊन सदर उपक्रम यशस्वी करण्यात अंजली भोईर यांना मोलाची साथ दिली. त्यांच्या संपर्कातील विविध समाजातील अनेकांना अशा वेगवेगळ्या मंगलप्रसंगी संबंधित पुस्तके देण्यासाठी प्रवृत्त करणारे असल्याबाबत अंजली भोईर आणि गोरख राजगुरू यांनी याप्रसंगी संकल्प जाहीर केला. संविधान जनजागृतीसाठी उचलेले हे पाऊल नक्कीच समाजात संविधानिक आदर्श मूल्ये रूजवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल असे मत अंजली भोईर यांनी व्यक्त केले.
यावेळी या पुस्तकाचे प्रकाशक विलास पवार, गोरख राजगुरू, सुमेध रोकडे, रमेश राऊत, निलेश शेलार, वंदना आर्केडे आणि अनिता राजगुरू आदी सर्व संविधानाचा प्रचार-प्रसार करणारे इंटरनॅशनल ह्युमन राइट्स कमिशनचे सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.