रायगड(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१६.०८.२०२२
रायगड – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विंधणे, रायगड येथे १५ ऑगस्ट २०२२ हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या तीनही दिवशी ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला. आज १५ ऑगस्ट रोजी सकाळी लेझीम पथकासह प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीत अनेक राष्ट्रपुरुष व देशभक्त क्रांतिकारक यांची वेशभूषा करून सामील झालेल्या विद्यार्थ्यांचे ग्रामस्थ कौतुक करत होते. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी गायलेल्या ‘ऐ प्यारी भारत मा’ या देशभक्तीपर गीताने वातावरणात चैतन्य निर्माण केले.
एक विशेष उपक्रम म्हणून शाळेतील मुख्याध्यापिका व शिक्षक वृंद यांच्यामार्फत गावातील ९४ वर्षे वयाच्या श्री.सखाराम गोमा नवाळी यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. पारतंत्र्य आणि स्वातंत्र्य हे अनुभवलेले श्री.सखाराम नवाळे या सत्कार प्रसंगी खूपच भावुक झाले. या भाऊक क्षणी बोलताना ते म्हणाले, “१५ऑगस्ट १९४७ ची स्वातंत्र्याची पहाट आणि आज १५ ऑगस्ट २०२२ च्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्याची पहाट अनुभवताना मला खूपच आनंद झाला आहे. हा तिरंगा सदैव असाच सन्मानाने फडकत राहू दे अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो.”
शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या “स्वातंत्र्याची गाथा” या हस्तलिखिताचे उद्घाटन सखाराम बाबांच्या हस्ते करण्यात आले. अमृत महोत्सवाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी अनेक देशभक्त क्रांतिकारकांची माहिती, आपली राष्ट्रीय प्रतीके, महापुरुषांची चित्रे त्याचबरोबर स्फूर्ती गीते यांचे संकलन करून स्वहस्ताक्षरात माहिती लिहून तयार केलेले हे हस्तलिखित खूपच आकर्षक असे आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व आभार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्रग्धरा पाटील मॅडम यांनी व्यक्त केले.