जालना(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०२.०२.२०२०
🔹 भाजपाचे ज्येष्ठ नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकरी मोर्चासाठी मार्गदर्शन करताना केले विधान
जालना- माजी मंत्री आणि भाजपाचे नेते बबनराव लोणीकर महिला तहसीलदारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शेतकरी मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी वेळ पडला तर हिरॉइन आणू आणि हिरॉइन न मिळाल्यास आपल्या तहसीलदार मॅडम आहेतच, असे विधान लोणीकर यांनी केले. दरम्यान, लोणीकर यांनी केलेल्या या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांना २५ हजार रुपये अनुदान मिळावे यासाठी परतूरमध्ये शेतकरी मोर्चा काढण्यासाठी बबनराव लोणीकर मार्गदर्शन करत होते. त्यावेळी ते म्हणाले की, ” शेतकऱ्यांना २५ हजार रुपये अनुदान हवे असेल, तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा मोर्चा मराठवाड्यातील परतूनहून निघाला पाहिजे. त्यासाठी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांना कार्यकर्ते जमवून आणले पाहिजेत. तुम्ही मला मोर्चासाठी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा, सुधीरभाऊ यांना घेऊन येण्यास सांगा, मी आणतो. प्रसंगी गर्दी जमवण्यासाठी एखाद्या हिरॉइन बोलावू, हिरॉइन नाही मिळाती तर आपल्या तहसीलदार मॅडम आहेतच.”
यासंदर्भातील आॅडीआे क्लिप काही प्रसार माध्यमांनी दाखवली आहे. दरम्यान, बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच लोणीकर यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. भाजपानेही त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.



















